'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व
ते केवळ दगड धोंडे नसतात |
ती परंपरेची हाक असते
जी ऐकली तरच आयुष्यात सुख मिळते |
परंपरेच्या नावाखाली सत्य काही झाकू नका
कोणत्याही दगडाला देव काही मानू नका |
🔗''पडझड 'जुन्या इमारतीत राहणाऱ्यांनी हे नक्की वाचावे | धोकादायक वास्तव आणि जागरूकतेची कथा
'गद्धेगळ - एक ऐतिहासिक वारसा'| गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व
चित्रात दिसणाऱ्या ऐतिहासिक शिळा ह्या महाराष्ट्राच्या अनेक भागात विशेषतः कोकणामध्ये पाहायला मिळतात. त्यांना गद्धेगळ (Gadhegal) म्हणून ओळखले जाते.महाराष्ट्राचा इतिहास फक्त तलवारी, किल्ले आणि युद्धांनी भरलेला नाहीतर तो परंपरा, दानधर्म, श्रद्धा आणि चेतावणी देणाऱ्या प्रतीकांनी ही समृद्ध आहे.अशाच प्रतीकांपैकी एक म्हणजे ‘गधेगळ’
गद्धेगळ हा महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासातील एक दुर्मिळ आणि महत्त्वाचा पुरातत्त्वीय वारसा मानला जातो. मंदिरे, किल्ले आणि प्राचीन स्थळांवर आढळणाऱ्या या शाप-शिळांवरील गाढव आणि स्त्रीची आकृती केवळ कलाकृती नसून त्या काळातील सामाजिक, धार्मिक आणि कायदेशीर संदेशांचे प्रतीक मानल्या जातात. या लेखात गद्धेगळ म्हणजे काय, त्याचा इतिहास, त्यावरील शिल्पांचा अर्थ आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील त्याचे महत्त्व सोप्या मराठीत जाणून घेऊया.
मध्ययुगीन काळात या गद्धेगळ (Gadhegal) शिळांना ‘सीमांक’ किंवा ‘भूमी अभिलेख’ म्हणून मानले जायचे. राजाने किंवा एखाद्या सरंजामदाराने दान दिलेल्या जमिनीचे रक्षण करण्यासाठी किंवा त्या जमिनीची हद्द निश्चित करण्यासाठी हे दगड जमिनीच्या सीमेवर लावले जात असत.
यावर कोरलेल्या चित्र शिल्पांचा अर्थ हा एका शापाचे प्रतीक म्हणून आहे. जर कोणी या दान दिलेल्या जमिनीचा गैरवापर केला किंवा ती हडपण्याचा प्रयत्न केला, तर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला भोगाव्या लागणाऱ्या शिक्षेचे किंवा शापाचे हे एक ‘चित्र शिल्प ‘ स्वरूप आहे.
अनेक ठिकाणी या गद्धेगळ (Gadhegal) शिळांच्या ऐतिहासिक महत्त्वाकडे दुर्लक्ष झालेले आहे किंवा काळानुरूप या मागील मूळ अर्थ मागे पडलेला आहे.ग्रामीण भागात अनेक ठिकाणी स्थानिक लोक या शिळांना शेंदूर फासून देव, सटवाई, बापदेव किंवा स्थानिक रक्षक देवता म्हणूनही ओळखतात आणि त्यांची भक्ती भावाने पूजा केली जाते.कोकणात याला अनेकदा जमिनीच्या वादापासून संरक्षण देणारी किंवा गावाच्या सीमेचे रक्षण करणारी प्रतिमा मानली जाते.
या शिळा चित्र शिल्पाची रचना सहसा वरच्या भागात सूर्य-चंद्र आहे. याचाच अर्थ असा की (जोवर सूर्य-चंद्र आकाशात आहेत तोवर हे दान कायम असेल असा त्याचा अर्थ आहे आणि त्या खाली शाप दर्शवणारे प्राणी म्हणजे गाढव आणि स्त्री यांचे शिल्प असते. दगडावर कोरलेले प्राणी हे एका विशिष्ट 'शापवाणी'चे प्रतीक आहे. याचा अर्थ असा की“जो कोणी या दानात किंवा नियमात हस्तक्षेप करेल, त्याला अपमानास्पद आणि पापपूर्ण परिणाम भोगावे लागतील.”
शिलाहार आणि यादव काळात महाराष्ट्रात दानधर्माला खूप महत्त्व होते.मंदिरे, मठ, ब्राह्मण आणि धार्मिक संस्थांना जमीन दान दिली जायची ,या जमिनीवरून त्या संस्थांचा खर्च चालत असे.गावकऱ्यांचे जीवनही त्यावर अवलंबून असे पण प्रश्न असा होता.की “ही जमीन सुरक्षित कशी ठेवायची ?” त्या काळात आजच्या सारखी कायदेशीर व्यवस्था नव्हती.म्हणूनच लोकांच्या मनात भीती आणि नैतिकता निर्माण करण्यासाठी ‘गधेगळ ‘सारखी शिल्पे वापरली जात. ‘गधेगळ ‘म्हणजे एक प्रकारचा मानसिक कायदा (Psychological Law) होता.लोकांना शिक्षा दाखवण्या ऐवजी त्यांना भीती दाखवून नियम पाळायला भाग पाडले जायचे,त्या काळातील लोक श्रद्धाळू होते.त्यामुळे तो “शाप लागेल” ही भावना खूप प्रभावी ठरत असे.
(वरील विषयाला धरून ही कथा आहे आणि ती पूर्णतः कल्पित आहे.)
माझा कॉलेज तसेच गिरगाव मित्र ‘मोहित नाईक ‘ हा गिरगावात त्यांच्या मावशी कडे राहायचा. तो माझा खूप चांगला आणि जवळचा मित्र होता.. कुठेही पहिले तर तो माझ्या सोबत असायचा मग ते लेक्चर बंक करणे असो किंवा कॉलेजच्या कट्ट्यावरील टाईमपास्ट असो,नाहीतर कॅन्टीन मधील खादाडगिरी असो.फक्त तो नसायचा माझ्या ‘पॉलिटिकल ॲक्टिव्हिटी ‘ मध्ये बाकी इतर सगळी कडे तो माझ्या सोबत असायचा.
त्याची मावशी आणि आई वडिलांना आमची मैत्री माहिती होती, ते त्याला वारंवार सांगायचे “ओमकार बरोबर रहा “ त्यांच्या दृष्टीने मी एक सभ्य आणि सदाचारी मित्र होतो. त्याच्या आई - वडिलांनी त्यांच्या पनवेलच्या घरी एक दोन वेळा मला बोलावले होते. सन 1989 च्या दरम्यान त्यांच्या वडिलांनी अलिबाग कडील एका गावात 12 गुंठ्याची अकृषिक जागा विकत घेतली होती. त्या जागेवर बंगला उभारण्याचे काम त्यांनी हाती घेतले होते.भूमिपूजन झाले होते. मला वेळ नसल्याने मी तेव्हा गेलो नाही.बंगल्याच्या पाया खुदाईचे काम सुरू झाले होते. ‘मोहित ‘चे वडील त्याला म्हणाले “मी अलिबागला जाणार आहे,तू येणार आहेस का ? जर येणार असशील तर ‘ओमकार’ ला सुद्धा सोबत घेऊन ये.” रविवारी सकाळी आमचे जायचे ठरले. ‘मोहित ‘ सोबत मी शनिवारी रात्री त्यांच्या पनवेलच्या घरी गेलो.वडील रसायनी भागात असलेल्या एका मोठ्या केमिकल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते.दुसऱ्या दिवशी त्यांच्या गाडीने सकाळी आम्ही अलिबागला रवाना झालो.’अलिबाग - रेवदंडा ‘ रस्त्यावर ते गाव आहे. रस्त्याच्या पलीकडे पश्चिमेकडे काही अंतरावर सुन्दर आणि मोकळा समुद्र किनारा आहे, तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला समुद्राची खाडी होती. रस्ता आणि त्या खाडीच्या मधील भागात त्यांचा प्लॉट होता.
आम्ही त्या प्लॉटवर गेलो तर बंगल्याच्या पाया खुदाईचे काम सुरू होते.खाडीचे पात्र जवळच असल्याने आल्दददायी आणि थंडगार हवा वाहत होती. शांत आणि सभोवताली हिरवळ असलेला परिसर तसेच तिथून काही अंतरावर टेकडीवर वसलेले सुप्रसिद्ध ‘चौल दत्त मंदिर’ या सर्वाचा विचार केला तर त्यांचे तिथे स्वप्नातील घर उभारायचा निर्णय एकदम योग्य होता.
आदल्या दिवशीच्या पहाटे पासूनच कामगारांनी पाया खोदण्याचे काम सुरू केले होते. मातीचा थर तसेच लहान- मोठे दगड धोंडे एकामागोमाग एक बाहेर काढले जात होते. त्या मधून एक मध्यम आकाराचा परंतु मोठा मातीने बरबटलेला एक दगड खुदाई करणाऱ्या कामगाराच्या हाती लागला. त्याला तो दगड जरा विचित्रच वाटला असावा,त्या दगडावर वर असलेले चित्र शिल्प ओल्या मातीतून डोकावत होते. तो दगड जरा वेगळाच दिसतोय म्हणून त्याने त्यांच्या ठेकेदाराला हाक मारून तो दगड दाखवला.ठेकेदार म्हणाला “उद्या साहेब येणार आहेत, त्यांना तो दाखवूयात” त्याने जसा आहे, तसाच तो दगड ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी गेल्यावर ठेकेदाराने तो दगड आम्हाला दाखवला.
आम्ही तो जवळ जाऊन पहायला लागलो. त्यावरील माती उन्हामुळे सुकलेली होती, त्यातून सुद्धा ते चित्र शिल्प दिसत होते. त्या दगडावर पाणी टाकून त्या वरील मातीचा ओला पुट बाजूला सारला आणि ते शिल्प स्वच्छ धुवून घेतले. शिल्प आता स्पष्ट दिसायला लागले, ते तर एक विचित्र शिल्प होते. ‘गधेगळ‘चे, थोडे झिजलेले, पण त्याचा स्पष्ट आकार दिसत होता.त्यावरील कोरलेली शिल्पे ही ‘गाढव ‘ आणि ‘ स्त्री’यांचे वाटत होते. शिवाय त्या शिल्पाभोवती काही जुन्या कोरीव खुणा सुद्धा होत्या.
हे पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो,हे काय आहे ? त्यावेळी इंटरनेट वरून माहिती पाहता येईल, खात्री करता येईल,अशी सोय नव्हती.’मोहितच्या ‘ वडिलांनी,सरपंचांकडे कामगार पाठवून त्या बाबतची माहिती कळविल्यावर ते सर्व जण ग्रामपंचायत ऑफिस मधून तडक जागेवर आलेत,काय झाले म्हणून पहायला.त्यापैकी एक जण म्हणाला “ सरपंच साहेब, हे काही ठीक वाटत नाही , ही जागा साधी नाही, त्यांचे काम लगेच थांबवा ” एकाने कुजबुजत सांगितले. त्यानंतर सरपंच म्हणाले “नाईक साहेब! हे बघा ,तुम्हाला घर बांधायला ग्रामपंचायतने अटी व शर्तीवर परवानगी दिलेली आहे.त्या मुळे तुम्ही थोडे दिवस थांबा, या बाबत आपण सविस्तर माहिती घेऊयात, जर त्यात काहीच समस्या नसेल, तर तुम्ही परत कामाला सुरुवात करा,परंतु तूर्त काम थांबवा” दुपारपर्यंत ही बातमी संपूर्ण गावात पसरली.दुपारनंतर परत सरपंचा सह गावातील काही ज्येष्ठ मंडळी तिथे आली. त्यांनी शिल्प पाहिले, ते सर्व जण एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहत होते,गावचे वयस्कर तात्या तुरकर पुढे आले. त्यांनी हळू आवाजात आम्हाला सांगितले की इथे “पूर्वी इथे एक लहानसे देवस्थान होते,असे आम्ही आमच्या पूर्वजांकडून ऐकले आहे. तेव्हा ही बाजूची खाडी सुद्धा नव्हती. हे समुद्र किनाऱ्यावरील गाव आहे. एकदा समुद्राला आलेल्या ‘ज्वारा’मुळे संपर्ण पंचक्रोशी समुद्राच्या पाण्याखाली गेली होती. जमलेल्या एकाने कुतुहलाने विचारले “समुद्राचा ज्वार म्हणजे काय हो ?”
जमलेल्या पैकी एका शिक्षकाने “ज्वारीय पूर'म्हणजे चक्रीवादळामुळे समुद्राचे पाणी खूप वाढून किनाऱ्यावर पूरासारखी स्थिती निर्माण करते,याला इंग्रजीत Tidal Flood असे सुद्धा म्हणतात.”हे त्याने उपस्थित जमलेल्या सर्वांना सांगितले. हा ज्वारीय पूर येण्या मागची मुख्य कारणे खूप आहेत परंतु त्या पैकी महत्त्वाचे कारण म्हणजे वादळे व चक्रीवादळे ही आहेत.” असे त्या शिक्षकांनी अधिकचे पुढे सांगितल्यावर ते म्हातारे तात्या म्हणाले “अगदी बरोबर, या मुळे ते जुने मंदिर त्या पाण्याच्या प्रवाहाच्या ओघात मातीखाली गेले असावे किंवा वाहून गेले असावे. हे शिल्प त्या मंदिराला मिळालेल्या जागेचे दानपत्राचे चिन्ह असू शकते.
जिकडे ती शिळा मिळाली तिथपर्यंत त्या देवस्थानाची सीमा असावी.” ‘विजय नाईक ‘ म्हणजे मोहितचे वडील संभ्रमात पडले.“मग आता काय करायचे?” त्यांनी विचारले. तात्या म्हणाले,“बंगल्याच्या बाजूला एक लहानसे मंदिर बांधा. त्याच्या बाजूलाच त्या शिल्पाला तिथे स्थान द्या. परंपरेचा मान राखला तरच या जागेचे कल्याण होईलआणि तुम्हाला ती जागा लखलाभ होईल”
‘विजय नाईकांनी ‘थोडा विचार केला.ते शहरात वाढलेले असल्याने अशा गोष्टींवर त्यांचा फारसा विश्वास नव्हता. परंतु गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे गांभीर्य आणि त्या जागेचे वातावरण पाहून त्यांनी मान हलवली.त्यांनी लगेच मंदिर बांधण्याचे ठेकेदाराला सांगितले “ठीक आहे,आपण इथे ‘गणपती बाप्पाचे’ मंदिर बांधू.” “सरपंचजी,ज्या आर्किटेक्चर कडून मी बंगल्याचा प्लॅन घेतला आहे. त्याच्या कडून मध्यम आकाराच्या मंदिराचा प्लॅन बनवून घेतो, तुम्ही कृपया मंदिर बांधण्याची परवानगी लवकर द्यावी,बंगला आणि मंदिर ही दोन्ही कामे एकावेळी सुरू करू” सरपंच हसून म्हणाले, “आता काम एकदम परफेक्ट झाले. गावात गणपतीचे मंदिर नाही. त्या मुळे गावकऱ्यांना सुद्धा त्याचा उपयोग होईल.तुम्ही मंदिराचा प्लॅन लवकर सादर करा. मी सत्वर मान्यता देतो”
बंगल्याच्या बांधकामाच्या अगोदर काही दिवसातच नाईकांच्या प्लॉटच्या कोपऱ्यात एक ‘गणपती बाप्पाचे ‘ सुंदर मंदिर उभे राहिले. ‘गधेगळ ‘चे शिल्प स्वच्छ करून तिथे प्रतिष्ठापित करण्यात आले.सरपंचाच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन झाले. गावकऱ्यांनी एकत्र येऊन पूजा केली. त्या दिवसानंतर बांधकामात कोणतीही अडचण आली नाही. ‘गणपती बाप्पा’च्या आशीर्वादाने बांधकाम सुरळीत सुरू राहिले. काही महिन्यांतच बंगला पूर्ण झाला.
विजय नाईक आणि परिवार जेव्हा पहिल्यांदा त्या बंगल्यात राहायला आले, तेव्हा त्यांच्या मनात एक वेगळीच शांतता होती. सकाळी मंदिरातील घंटानाद ऐकताना, त्यांना जाणवले की या जागेशी आता एक नाते तयार झाले आहे.त्यांच्या बंगल्याच्या गृहप्रवेशा वेळी मला आमंत्रण असल्याने, मी गेलो होतो. मंदिर एकदम झकास बांधले होते. त्यावेळी आलेले गावकरीही आनंदी आणि समाधानी दिसले. त्यांनी केवळ एक घर नव्हे, तर आपल्या परंपरेचं पुनरुज्जीवन सुद्धा पाहिले होते.देवळाच्या काही अंतरावर ठेवलेल्या त्या चित्र शिल्पाला कोणी तरी शेंदूर फासल्याचे दिसत होते. प्रत्यक्षात ते शिल्प हे आपल्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहे,मात्र त्याला देव समजून पूजा करणे कितपत योग्य आहे ? हा प्रश्न मला पडला.
मी स्वतः आस्तिक आहे, पण ‘देव ‘ही संकल्पना इतकी स्वस्त नाही की कोणत्याही दगडाला शेंदूर फासून त्याला देवत्व द्यावे. ‘श्रद्धा ‘नक्कीच वैयक्तिक आणि आदरणीय आहे, परंतु त्या श्रद्धेमुळे जर आपल्या इतिहासाचे, कलाकृतींचे नुकसान होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य होणार नाही.
🔗 "मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा"
"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."
📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख
💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा
पुढील भागासाठी ब्लॉगला Follow करा.आणि आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.
sjomkar.blogspost.com ब्लॉगला Follow करा.
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी © All Rights Reserved
🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com
(ओमकार शिवलकर )
📩 Subscribe करा
नवीन पोस्ट लगेच मिळवा!



हा लेख अतिशय विचारप्रवर्तक आहे. विषयाची मांडणी आणि मुद्द्यांची सखोलता आवडली.
उत्तर द्याहटवासुन्दर आणि प्रभावी अभिप्राय !
हटवालेख वाचून विषयाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी मिळाली. विषय अत्यंत नेमकेपणाने आणि प्रभावीपणे मांडला आहे
उत्तर द्याहटवाआभार! उत्साहवर्धक अभिप्राय
हटवामाहितीपुर्ण लेख
उत्तर द्याहटवाधन्यवाद !
उत्तर द्याहटवाधन्यवाद !
उत्तर द्याहटवा