“प्रेमाचा त्रिकोण | एकतर्फी प्रेम, अपूर्ण नाती आणि चुकीच्या निर्णयांची भावनिक मराठी कथा ..
प्रेमाचा त्रिकोणनेहमीच अपूर्णच राहतो |
कुणाला न्याय मिळतो,
तर कुणावर अन्यायच होतो |
प्रेम होते सगळ्यांनाच,
पण किंमत कुणीच ओळखत नाही|
कोणी आयुष्यभर वाट पाहते,
आणि कोणी कधी वळूनही पाहत नाही
या मधून समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोकांमधून मिळणारे अमूल्य जीवन ज्ञान तसेच मन शांत, यशस्वी आणि सकारात्मक कसे ठेवावे ? बाबतचे विचार आणि प्रेरणादायी ३ कथा जाणून घेतली असेल आता पुढची लघु कथा आहे...
“प्रेमाचा त्रिकोण - एकतर्फी प्रेम, अपूर्ण नाती आणि चुकीच्या निर्णयांची भावनिक मराठी कथा..
प्रेम ही भावना जितकी सुंदर, तितकीच गुंतागुंतीची आहे. पण जेव्हा या प्रेमात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश होतो, तेव्हा सुरू होतो भावनांचा संघर्ष ,एकतर्फी प्रेम, अपूर्ण नाती आणि निर्णय न घेण्याची वेदना.अनेक वेळा प्रेम अपयशी ठरत नाही तर आपण घेतलेले किंवा न घेतलेले निर्णय अपयशी ठरतात.या कथेतील दोन वेगवेगळे प्रेम त्रिकोण एक दाखवते जिथे प्रेम एकतर्फी राहते आणि आयुष्य वाट पाहण्यात संपते आणि दुसरे दाखवते ,जिथे निर्णय न घेतल्याची शिक्षा संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागते ही फक्त कथा नाही, तर ती वास्तवातील प्रेम, प्रतीक्षा आणि चुकीच्या निवडीचा आरसा आहे.
खरे तर 'प्रेमाचा त्रिकोण' या विषयावर अनेक कथा, कादंबऱ्या आणि चित्रपटांचा हा लोकप्रिय विषय आहे. भावनांचा गुंता आणि नात्यांची परीक्षा यात पहिली जाते. प्रत्येकाने एकाच प्रेमाचा हट्ट धरावा. एकावेळी दोन प्रेमाची लालसा धरली की जीवनात गुंता तयार होतो. एकाच प्रेमाशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करावा, तिसऱ्या कुणाला गैरसमज होईल असे पहिल्या किंवा दुसऱ्याचे वर्तन आढळले तर असे त्रिकोण तयार होण्याची शक्यता जास्त असते.
प्रेम ही मानवी जीवनातील एक अत्यंत नाजूक आणि गहिरी भावना आहे. मात्र, जेव्हा या भावनेत तिसऱ्या व्यक्तीचा समावेश होतो, तेव्हा निर्माण होणाऱ्या परिस्थितीला “प्रेमाचा त्रिकोण” असे म्हणतात. या नात्याच्या स्वरूपात तीन व्यक्तींमध्ये भावनिक किंवा रोमँटिक गुंतागुंत तयार होते, ज्यामुळे अनेकदा ताण, गोंधळ आणि निर्णय घेण्याची अडचण निर्माण होते.
प्रेमाचा त्रिकोण विविध प्रकारांनी दिसून येतो. काही वेळा दोन व्यक्ती एकाच व्यक्तीवर प्रेम करतात, तर काही वेळा एक व्यक्ती दोन वेगवेगळ्या लोकांबद्दल आकर्षण अनुभवते.
साहित्य, नाटक आणि चित्रपटांमध्ये प्रेमाचा त्रिकोण हा एक लोकप्रिय विषय आहे. कारण या विषयातून मानवी मनातील गुंतागुंतीच्या भावना आणि नात्यांतील बदल प्रभावीपणे मांडता येतात. त्यामुळे प्रेक्षक किंवा वाचक यांना या कथांशी सहजपणे जोडले जाता येते.
वास्तव जीवनात, प्रेमाचा त्रिकोण ही एक आव्हानात्मक परिस्थिती असते. अशा वेळी संयम, समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणा या गुणांची गरज असते. योग्य निर्णय घेतल्यास नाती टिकवता येतात किंवा किमान त्यातून सन्मानपूर्वक बाहेर पडता येते.
शेवटी, प्रेमाचा त्रिकोण हा फक्त एक नात्याचा प्रकार नसून, तो मानवी भावनांची परीक्षा घेणारा अनुभव आहे. वरील ज्या दोन संभावना आहेत त्यातील दोन्ही प्रकारचे प्रेमाचे त्रिकोण पहायला मिळतील
प्रेमाचा त्रिकोण पहिला प्रकार - एकतर्फी प्रेमाची साखळी !
मंदिर जवळ असल्याने ती मला एक दिवसाआड ' सिद्धिविनायक मंदिरात' घेऊन जायची. मंदिराचे अंतर सुद्धा घरा पासून काही दुर नव्हते, पण तिच्या प्रेमाला अंतराचे मोजमाप नव्हते.
प्रभादेवीच्या एका वाडीत पहिल्यांदाच ‘प्रेम’ हे कसे असते ते कळले.मात्र काय असते ते नंतर मोठेपणी उमगले . आजीच्या नकळत तिच्या नातवाकडे एक मोठे काम येऊन पडले होते.एका प्रेम त्रिकोणात माझी ‘पोस्टमन’ म्हणून एन्ट्री झाली, चिठ्ठ्या पोहोचवणे, ही माझी जबाबदारी झाली होती.पण ही ‘पोस्टमनगिरी’ फार काळ टिकली नाही, एके दिवस आजीच्या लक्षात हा सगळा प्रकार आला, आणि तिने त्या मुलीला चांगलेच झणकावले! आणि त्या क्षणापासून माझे“पोस्टमन”चे नुकतेच सुरू झालेले करिअर अचानक संपुष्टात आले.
त्या “पोस्टमन” ला त्याच्या कामात ना शाबासकी होती , ना काही बक्षीस तो अगदी ‘थॅन्कलेस जॉबच’ होता. ज्या मुलीसाठी मी चिठ्ठ्या पोहोचवत होतो, ती त्या भागातील एका देखण्या मुलाच्या प्रेमात पडली होती. ती स्वतःही नाकी-डोळी नीटस, गोड दिसणारी होती.पण तो मुलगा,मी दिलेल्या चिठ्ठ्या वाचणे तर दूरच, तो त्या सरळ खिशात कोंबून ठेवायचा!तो चिठ्ठी वाचतो कां नाही ?. लहानपणीचे ते कुतूहल मोठेपणी माझ्या प्रश्नात बदलले.“जर ज्याचे खरे प्रेम असेल, तर तो माणूस ती चिठ्ठी लगेच उघडून वाचणार नाही का?”नंतर त्याने कधी त्या चिठ्ठ्या उघडून वाचल्या असतील का ? की त्या फाडून टाकल्या असतील. त्यातले ‘प्रेम’ त्याला कधी कळले असेल का? देवास ठाऊक ! त्या बालमनातील कुतुहलाच्या प्रश्नांची उत्तरे शेवट पर्यंत मला कधीच मिळालीच नाहीत.
मी तेव्हा अवघा चार-पाच वर्षांचा होतो. माझ्या भोवती नेमके काय सुरू आहे ? याची मला काहीच कल्पना नव्हती. चिठ्ठ्या पोहचवणे म्हणजे एखादा खेळच आहे, इतकेच मला वाटायचे.पण आज जेव्हा त्या भूतकाळात डोकावतो, तेव्हा जाणवते.आपण नकळत एका प्रेमकथेचा छोटासा भाग होतो.जसजसे वय वाढत गेले तसतसा त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ मला उमगायला लागला. त्या चिठ्ठ्या, ती घाईगडबड, ते लपूनछपून दिलेले संदेश, सगळेच हळूहळू स्पष्ट होत गेले.या कथेतील ज्या मुलीच्या बाजूने मी “पोस्टमनगिरी” करत होतो, तिचे नाव होते ‘सुहासिनी’. ती आजीच्या माहेरच्या बाजूची एक मुलगी होती.तसे पाहिले तर घरचेच, आपुलकीचे नाते आणि या कथेतील “हिरो” होता यशवंत,त्या भागातील एक देखणा, थोडासा बेफिकीर, पण सगळ्यांच्या नजरेत भरून राहणारा प्रेमवीर युवक.खरे तर त्या प्रभादेवीच्या परिसरात राहणारे सगळेच लोक काही ना काही नात्याने एकमेकांशी जोडलेले होते,कोणी दूरचे, कोणी जवळचे, कोणी गावाकडचे, तर कोणी समाजाने एकत्र आलेले. त्या सगळ्या नात्यांच्या जाळ्यात ही ‘एकतर्फी प्रेमकथा’ शांतपणे फुलत होती.
आज मागे वळून पाहिले, तर एक गोष्ट स्पष्ट जाणवते की ज्याचे प्रेम खरेच दोन्ही बाजूंनी प्रामाणिक असते, त्यांच्या जवळ येण्याला कोणतीच अडचण येत नसते. त्या दोघांच्या बाबतीत परिस्थिती तशी अनुकूलच होती,दोन्ही बाजूंनी कुठलाही त्यांना उघड विरोध नव्हता.मग अडथळा नक्की कुठे होता?तर तो होता ,स्वतः यशवंतमध्ये, तो तिच्याशी खऱ्या प्रेमाने नव्हे, तर केवळ दिखाऊ, नाटकी भावनांनी वागत होता. कधी गोड बोलणे, कधी दुर्लक्ष,अशा प्रेमी चाळ्यांनी तो तिला सतत झुलवत ठेवत होता. तिच्या मनात आशेची ज्योत पेटवायची, आणि पुन्हा तीच फुंकर घालून विझवायची,हा त्याचा जणू खेळच होता. ती,भोळी, निरागस त्या खोट्या भावनांना खरखुरे प्रेम समजून बसली होती.ती सतत त्याचाच विचार करत राहायची“तो आज येईल,कदाचित उद्या नक्की येईल”पण तो शेवट पर्यंत कधीच आला नाही. फक्त तिला वाट पाहत ठेवत राहिला. अपूर्ण राहिलेल्या या व अशा गोष्टी कधीतरी आठवल्या जातात.
काही मुलांना “आपल्यावर एखादी मुलगी प्रेम करते” हीच गोष्ट मोठेपणाची, मिरवण्या सारखी वाटते. ‘यशवंत’साठीही ‘सुहासिनी’चे प्रेम असेच काहीसे होते,मित्रांमध्ये सांगण्यासारखी गोष्ट, अभिमानाने मिरवण्यासारखी, एक दिखाऊ भावना, पण त्यापलीकडे काहीच नाही.एकीकडे सुहासिनी मनापासून झुरत होती.त्याच्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक हालचालीला अर्थ देत होती.आणि दुसरीकडे, 'यशवंतला' तिच्या त्या प्रेमाची काहीच पर्वा नव्हती.कारण त्याचे मन तर दुसरीकडे म्हणजे ‘अंबिका’ नावाच्या दुसऱ्या मुलीत अडकलले होते. यशवंत साठी ते मात्र त्याचे पहिले प्रेम होते.ज्या पद्धतीने तो ‘सुहासिनी’ला झुलवत होता,त्याच पद्धतीने ‘अंबिका’ सुद्धा त्याला झुलवत होती.‘सुहासिनी’ला वाटायचे“यशवंत माझ्यावर प्रेम करतोय”आणि ‘यशवंत’ला वाटायचे“अंबिका माझ्यावर प्रेम करते”पण वास्तव काही वेगळेच होते.
‘अंबिका’साठी ‘यशवंत’कधीच पहिला पर्याय नव्हता.तिचे मन तर ‘नारायण’ नावाच्या मुलाकडे ओढले गेले होते.आणि गंमत म्हणजे,ज्याचे ‘सुहासिनी’वर खरे प्रेम नव्हते,तोच ‘यशवंत’ ‘अंबिका’वर मात्र जिवापाड प्रेम करत होता.एकतर्फी प्रेमाची ही साखळी अशीच पुढे चालू होती.कोणी तरी कोणासाठी झुरत होते.पण ज्याच्यासाठी झुरत होते, तो तर कुणा दुसऱ्याच्याच प्रेमात हरवलेला होता.
“प्रेम नेहमी सरळ रेषेत चालत नाही कधी ते वर्तुळ बनते, आणि प्रत्येक जण कुणा ना कुणाच्या प्रतीक्षेत अडकून पडतो.”
अखेरीस या प्रकरणाला मोठे वळण मिळाले.‘अंबिका;’आणि ‘नारायण’ यांचे लग्न झाले. त्या घटनेने ‘यशवंत’ पूर्णपणे कोसळला. इतका की त्याने आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा केला. सुदैवाने, घरच्यांनी वेळीच केलेल्या धडपडीमुळे तो वाचला.याच दरम्यान, त्याच्या घरच्यांनी ‘सुहासिनी’ला सून म्हणून स्वीकारण्याची तयारीही दाखवली होती. दोन्ही बाजूनी अनौपचारिक चर्चा होत होत्या,एक मार्ग जणू तयार होत होता.पण,यशवंतच्या वागण्यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसत होती.की तो लग्नासाठी तयारच नव्हता.त्याच्या मनात अजूनही ‘अंबिका’च होती.आणि म्हणूनच त्या सगळ्या चर्चा निष्फळ ठरत गेल्या. वेळ मात्र पुढे पुढे सरकत होती,हा निर्णय मात्र तिथेच अडकून पडला होता.‘यशवंत’ लग्नाशिवाय राहिला,आणि ‘सुहासिनी’ही त्याच प्रतीक्षेत थांबून राहिली.
वय मात्र कोणासाठी थांबत नाही,ते शांतपणे पुढे जात राहिले ‘सुहासिनी’चा स्वभाव थोडा ‘अडले घोडे, पुढे सरकत नाही’ असा झाला होता.एकाच भावनेत अडकून पडलेली.व्यवहारिक निर्णय घेण्यापेक्षा, ती परिस्थिती आणि घरच्यांवर अवलंबून राहिली.कदाचित तिने त्या वेळेस वास्तव स्वीकारून पुढे पाऊल टाकले असते.तर तिचे आयुष्य आज वेगळ्या दिशेने गेले असते.कधी कधी, योग्य वेळी घेतलेला निर्णयच आयुष्य बदलतो,आणि तो न घेतल्याची किंमत मात्र आयुष्यभर मोजावी लागते.बराच काळ लोटला,प्रत्येकजण आपल्या आपल्या वाटेने पुढे जात होता.
‘अंबिकेच्या’ आयुष्यात मोठा धक्का बसला तिचा पती ‘नारायण’ याचे निधन झाले. आयुष्याने पुन्हा एकदा वळण घेतले आणि त्या वळणावर तिने तिचा ‘दुसरा विकल्प’असलेल्या ‘यशवंत’सोबत लग्न केले.’यशवंत’लाही जणू त्याच्या अपूर्ण राहिलेल्या प्रेमाला एक उशिरा का होईना, शेवट मिळाला,पण या सगळ्यात एक गोष्ट कायम टोचत राहते.इतकी वर्षं उलटून गेली, तरी ‘यशवंत’ने कधीही ‘सुहासिनी’च्या खऱ्या, निस्वार्थ प्रेमाचा विचार केला नाही. तिच्या भावनांकडे त्याने कायमच दुर्लक्ष केले. जिथे त्याला स्वतःचे अपूर्ण प्रेम दिसत होते.तिथे तो धावत गेला,पण जिथे कोणीतरी त्याच्यावर जीव ओवाळून टाकत होते,तिथे त्याने पाठ फिरवली.आणि ‘सुहासि’नी, मात्र शेवटपर्यंत त्याच प्रेमात अडकून राहिली.लग्न केले नाही.स्वतःसाठी वेगळी वाट निवडली नाही.काळ पुढे जात राहिला,आणि पंचाहत्तरी गाठून, एकट्यानेच ती या जगातून निघून गेली.ही कथा एक प्रश्न सोडून जाते प्रेम खरे असणे पुरेसे असते का ?कदाचित नाही,कारण ‘खऱ्याची दुनिया नसते’ असे म्हणतात ते काहीच खोटे नाही.
प्रेमासोबत वेळेवर घेतलेला निर्णय आणि स्वतःसाठी उभे राहण्याची ताकदही तितकीच गरजेची असते. ‘सुहासिनीला’ त्या आंधळ्या प्रेमातून शेवटी काय मिळाले?वार्धक्यातील असहाय्यता,स्वतःचे असे काही उरले नाही,आणि शेवटी भावाच्या घरातच तिने अखेरचा श्वास घेतला.आयुष्यभर ज्या प्रेमासाठी ती जगली,ते प्रेम तिच्या वाट्याला कधी आलेच नाही.आणि म्हणूनच कदाचित म्हणतात ना “दिल है की मानता नही” .
प्रेमाचा त्रिकोण दुसरा प्रकार - ‘निर्णय न घेतल्याची शिक्षा’
हळूहळू त्यांचे प्रेम रत्नागिरी मधील,वाऱ्याबरोबर अधिकच खुलत गेले.कधी ‘आरे-वार्या’ च्या उथळ किनाऱ्यावर,तर कधी ‘राजीवडा समुद्रकिनारी,तो तिला सोबत घेऊन जायचा. त्या लाटांमध्ये, त्या वाऱ्यात, त्यांच्या प्रेमाला एक वेगळीच उब मिळायची.हळूहळू दोघांनीही मनाशी ठरवले आता हे नातं पुढे न्यायचे लग्न करायचे.एक मात्र गोष्ट घडली.तिला नोकरी करायची इच्छा असूनही,त्याने तिला तसे करू दिले नाही.त्या काळात कदाचित हे सामान्य मानले गेले असेल,आणि तिनेही प्रेमापोटी ते स्वीकारले शेवटी त्यांच्या लग्नाचा दिवस उजाडला.धूमधडाक्यात, आनंदात, सगळ्यांच्या आशीर्वादात लग्न पार पडले.आणि मग सुरू झाला त्यांचा संसार.
प्रेमाने भरलेला, हळूहळू फुलत जाणारा.काळ पुढे सरकत गेला.त्यांना दोन अपत्ये झाली,पहिली मुलगी, आणि मग मुलगा.आणि तोच मुलगा,आमच्या गिरगावातला माझा मित्र, शेखर.एके दिवशी त्यानेच मला ही सगळी कथा सांगितली.तेव्हा तो साधारण 12 ते 13 वर्षांचा नुकताच समजायला लागलेला, पण अजूनही बालपणाची निरागसता जपून ठेवलेला.
त्या मुलाचे वडील ‘केशव आंब्रे’ रत्नागिरीतील एक ख्यातनाम वकील होते.त्यांची प्रॅक्टिस जोरात सुरू होती. मुळातच ते सुखवस्तू कुटुंबातून आलेले असल्यामुळे, वारसा हक्काने त्यांच्याकडे भरपूर संपत्तीही होती.सगळे काही व्यवस्थित चालले होते.पण आयुष्याने अचानक निराळेच वळण घेतले त्यांच्या ओळखीत असलेकी एक सहकारी वकील कुमारी ‘दिपाली’ हिच्याशी त्यांचे जवळचे संबंध जुळले. ओळख वाढत गेली, आणि हळूहळू ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले.आणि मग एक निर्णय झाला,जो सगळ्यांच्या आयुष्याला बदलून टाकणारा ठरला.श्री. ‘केशव आंब्रे’ यांनी, पहिली पत्नी ‘अलकनंदा’ हिच्यासोबत कोणतीही मोठी कौटुंबिक समस्या नसतानाही, केवळ दुसऱ्या स्त्रीवरील प्रेमामुळे काडीमोड (घटस्फोट) घेतला.
‘अलकनंदा’ साठी हा जबरदस्त धक्का होता.तिच्याआयुष्याचा पाया जणू एका क्षणात कोसळला,नवऱ्याचे वागणे सहन करणे तिच्या पलीकडचे होते.क्षणभर तिच्या मनात स्वतःला संपवण्याचाही विचार आला,पण तिच्या पदरात दोन लहान मुले होती.“त्यांना आईच्या प्रेमा पासून वंचित का करायचे?”हा प्रश्न तिच्या मनात ठाम उभा राहिला,आणि तिने तो कठोर निर्णय टाळला.तिने स्वतःला सावरले.कोणताही वाद, भांडण किंवा प्रतिकार न करता शांतपणे तिने नवऱ्या पासून वेगळे होण्याचा निर्णय स्वीकारला.
तिच्यासाठी आणि त्या दोन लहान मुलांसाठी,पोटगी (Maintenance) देण्याचे केशव यांनी मान्य केले.पण,ज्याचे घर एकेकाळी प्रेमाने भरलेले होते.ते आता तुटून तीन वेगळ्या वाटांवर विखुरलेले होते.ती विचार करत राहिली “मीही त्याच्यावर प्रेम करूनच लग्न केलेली पत्नी होती,दहा वर्षांचा संसार,सगळे काही सुरळीत सुरू असताना,असे अचानक तुटून जावे ?”“माझे काय चुकले होते ?”हा प्रश्न तिच्या मनाला सतत कुरतडत राहिला.उत्तर मात्र कधी मिळालेच नाही,केवळ दुसऱ्या स्त्रीवर प्रेम आहे म्हणून,एखाद्या नात्याला इतके सहज तोडणे,हे कितपत योग्य होते ?हा प्रश्न उराशी घेऊनच ती मुंबई येथे आपल्या लहान भावाकडे राहायला आली.
तिच्या आयुष्यात तक्रार करण्यासारखे काही नव्हते.ना कुणाशी भांडण, ना कुणावर राग,पण आतून एक पोकळी कायम होती.ती आणि तिची दोन मुले मामाच्या घरी नव्याने आयुष्य उभे करत होती.काळ पुढे सरकत गेला,मुले मोठी झाली.भावाचे लग्न झाले आणि सुदैवाने त्याची पत्नीही प्रेमळ, समजूतदार होती.घरात कुठलाही ताण नव्हता.उलट एक आधार होता.मुलीचे शिक्षण पूर्ण झाले ती ग्रॅज्युएट झाली.मुलगा अजून शिकत होता,पण अभ्यासात त्याची विशेष प्रगती दिसत नव्हती.जीवन काहीसे स्थिरावल्या सारखे वाटत असतानाच,एक अनपेक्षित बातमी आली,‘केशव आंब्रे’ यांची दुसरी बायको ‘दिपाली’ हिचे निधन झाले.त्या घटनेनंतर जेमतेम महिना उलटला असेल,तोच ‘केशव’ स्वतः मुंबई येथे आला‘अलकनंदा’ला परत घेऊन जाण्यासाठी.खरे तर,‘अलकनंदा’च्या मनात परत जाण्याचा अजिबात विचार नव्हता.जिथे तिचे आयुष्यच एकदा तुटले होते.तिथे पुन्हा पाऊल टाकायचे ?
हा विचारही तिला पटत नव्हता.पण,परिस्थिती माणसाला जे निर्णय घ्यायला भाग पाडते, तो मनाला ‘पटो वा न पटो’ ते निर्णय घ्यावेच लागतात.लहान भावाचा वाढता संसार.वृद्ध आई,गिरगावातील लहानसे घरआणि त्यात तिची दोन वाढती मुले.मुलीचे लग्नाच वय झालेले ,मुलगा अजून स्थिरावलेला नाही.या सगळ्या वास्तवाने तिला एकच प्रश्न विचारायला भाग पाडले
“आता पुढे काय?”मुलांच्या भवितव्याचा विचार करत,आणि भावाचाही भार कमी व्हावा म्हणून तिने एक कठीण निर्णय घेतला.भाऊ आणि दोन्ही मुलांनीही त्या निर्णयाला मान्यता दिली.आणि मग,‘अलकनंदा’ मनाविरुद्ध का होईना,ती पुन्हा रत्नागिरी येथे त्याच नवऱ्याकडे परतली.ज्याने कधी काळी नाकारले होते.
प्रेम सगळ्यांनाच होत पण त्याला न्याय देण्याचे धाडस सगळ्यांकडे नसते.”तिने स्वतःसाठी निर्णय घेतला नाही ती परिस्थितीमुळे शरण गेली, तिचे आयुष्य तिच्या हातात कधीच राहिले नाही शेवट पर्यंत…
“प्रेम असणं महत्त्वाचं आहे पण योग्य वेळी योग्य निर्णय घेणं त्याहून महत्त्वाचं आहे.” हे आपण वरील कथेत पाहिले असेल...
🔗 "तो जळाला,पण अजूनही दार ठोकतोय |एक थरकाप उडवणारी भय कथा ! "
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
"प्रत्येक कथेमागे दडलेले असते एक सत्य... आणि प्रत्येक सत्यामागे एक वेदना."
📖 रहस्यकथा | सामाजिक कथा | थरारक मालिका | इतिहास | प्रेरणादायी लेख
💬 कथा आवडली असेल तर तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की लिहा
पुढील भागासाठी ब्लॉगला Follow करा.आणि आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.
sjomkar.blogspost.com ब्लॉगला Follow करा.
SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी © All Rights Reserved
🌐 ब्लॉग: https://sjomkar.blogspot.com
(ओमकार शिवलकर )
📩 Subscribe करा




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा