अस्वीकरण -
सौंदर्य : शाप की वरदान | एपिसोड ३ : मेणबत्ती विझण्यापूर्वी..
🔗सौंदर्य : शाप की वरदान | एपिसोड 2 - पाहुणचार की सापळा? | मराठी रहस्यकथा..
मागील भाग 2 वरून पुढे..
त्याने नकळत मान हलवली.
"हुजूर..माझ्या दृष्टीने हा मोठा सन्मान आहे."
नेताजी किंचित हसले.
मोहनलाल खोलीबाहेर आला.
उमासाठी हा प्रस्ताव अनपेक्षित होता. वयातील मोठे अंतर तिच्या मनात पहिल्यांदा पुढे आले.पण दुसरीकडे समाजात सतत अनुभवलेल्या असुरक्षित नजरा, प्रभावशाली कुटुंबात मिळणारे संरक्षण आणि आपल्या आई-वडिलांच्या अपेक्षा यांच्यामध्ये तिचे मन हेलकावे खात राहिले. बराच वेळ शांत राहिल्यानंतर तिनेही अनिच्छेने का होईना, विरोध केला नाही.
काही वेळाने मोहनलाल पुन्हा खोलीत आला. त्याच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होते.
"हुजूर," तो म्हणाला, "मी दोघींशी बोललो. त्यांना कोणताही आक्षेप नाही."
नेताजी काही क्षण निःशब्द बसून राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हलके स्मित उमटले तर मोहनलालला वाटत होते की, त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय आज त्याच्या बाजूने लागला आहे.
नेताजी समाधानाने हसले.
"छान. निर्णय घाईघाईत न घेता विचार करून घेतलात, हे बरं झालं."
क्षणभर थांबून त्यांनी पुढे म्हटलं,
"मोहनलाल, एवढ्या मोठ्या निर्णयापूर्वी मला उमाशी दोन शब्द बोलायचे आहेत. तिचा स्वभाव, समज आणि घरातील संस्कार जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. शेवटी आमच्या दोघांच्या आयुष्यभराचा प्रश्न आहे."
मोहनलालने तत्परतेने मान डोलावली.
"जशी तुमची इच्छा, हुजूर."
नेताजी पुढे म्हणाले,
"मी दिवसभराच्या प्रवासाने आणि सभांनी थकलो आहे. आधी जेवण आटपू दे. त्यानंतर थोडावेळ निवांत बोलू. त्यानंतरच पुढचा निर्णय घेऊ."
इतक्यात त्यांनी आवाज दिला,
"राजू...!"
खासगी शिपाई धावत आत आला.
"जी, मालक."
"जेवणाची व्यवस्था पाहा. दोन ताटं वाढा. आता मोहनलाल माझे पाहुणे आहेत."
हे शब्द ऐकताच मोहनलालच्या मनातील शेवटची शंकाही दूर झाली. त्याला खात्री वाटू लागली की नेताजींनी हा संबंध मनापासून स्वीकारलेला आहे.
तो आनंदाने बाहेर आला. रमादेवी आणि उमाला त्याने घडलेला संवाद सांगितला.उमाला तो पुढे म्हणाला
"साहेबांशी आदराने बोल. ते काय विचारतील त्याची शांतपणे उत्तरं दे. त्यांच्या मनात आपल्या घराबद्दल चांगला ठसा उमटला पाहिजे.तू मोठ्या तालेवार घराण्याची सुन होणार आहेस.."
रमादेवी शांतपणे ऐकत होती. उमाच्या मनात मात्र अनेक प्रश्नांचे वादळ उठले होते. वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ती काही बोलली नाही. एका बाजूला कुटुंबाच्या अपेक्षा, दुसऱ्या बाजूला स्वतःच्या मनातील संकोच या दोन भावनांमध्ये ती निःशब्द उभी राहिली.
त्या रात्री घरातील प्रत्येक जण वेगवेगळ्या स्वप्नांत आणि वेगवेगळ्या चिंतेत हरवला होता. पण त्या शांततेच्या आड नियतीने कोणते वळण ठेवले आहे, याची कल्पना अजून कोणालाच नव्हती.
जेवणानंतर पुन्हा घर, लग्न आणि भविष्यातील योजनांवर चर्चा रंगली. नेताजी इतक्या आत्मविश्वासाने बोलत होते की, मोहनलाल आणि रमादेवी यांच्या मनातील उरल्यासुरल्या शंकाही हळूहळू विरघळू लागल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर नव्या घराची, वाढलेल्या मानमरातबाची आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने तरळत होती.
झोपायला जाण्या अगोदर नेताजी शांत स्वरात पुन्हा म्हणाले, “हे बघ,मोहनलाल,मघाशी मी बोललो की एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी मला उमाशी निवांत आणि एकांतात बोलायचं आहे. तिचा स्वभाव, तिचे विचार जाणून घ्यायचे आहेत. शेवटी ती माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.” त्यावर मोहनलाल तत्परतेने आणि निश्चिंतपणे म्हणाला “हो,नेताजी..तुम्ही म्हणता तसेच होईल..” कारण त्याने सदर बाब रमादेवी आणि उमा यांचेकडून अगोदरच वदवून घेतली होती.
दरम्यान, हिवाळ्यातील ती उत्तर भारतातील रात्र अधिक गडद होत गेली. थंड वाऱ्याच्या झुळुका अंगावर शहारे आणत होत्या. मेळाव्याच्या मैदानावर दिवसभर घुमणारे लाऊडस्पीकर अचानक शांत झाले. काही क्षणांतच मैदानावरील प्रखर फ्लडलाइट्सही एकामागून एक बंद पडले. काही वेळापूर्वी रोषणाईने झगमगणारा परिसर क्षणात गडद अंधाराच्या कवेत गेला. वातावरणातील रातकिड्यांची अखंड किरकिर, दूरवर अधूनमधून कुत्र्यांचे भुंकणे आणि थंड वाऱ्याने हलणाऱ्या झाडांची सळसळ एवढेच आवाज ऐकू येत होते.गावभर एक विलक्षण शांतता पसरली.जणू निसर्गही एखाद्या अनिष्ट प्रसंगाचा निःशब्द साक्षीदार बनून थांबला होता.
अशातच गावातील वीज गेल्याने घरात घाईघाईने मेणबत्त्या पेटवण्यात आल्या. नेताजींच्या खोलीतही एक मेणबत्ती लावण्यात आली. तिच्या लुकलुकणाऱ्या प्रकाशात भिंतींवर पडणाऱ्या अंधार सावल्या सतत बदलत होत्या.
काही वेळाने घरातील मंडळी आपापल्या कामात गुंतली. त्याच वेळी नेताजींनी उमाला शांतपणे त्यांच्या खोलीत बोलावून घेतले. उमाचे अलौकिक सौंदर्य पाहून ते क्षणभर तिच्याकडे एकटक पाहतच राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर सौजन्यपूर्ण हास्य होते, पण त्या हास्यामागे नेमके काय दडले आहे, याची उमाला अजून कल्पना नव्हती.
ती खोली काळोखात बुडाली.
बाहेरची रात्र जशी गडद झाली होती, तशीच त्या घराच्या भविष्यावरही नकळत सावल्यांची एक जाड चादर पसरली.
पहाटेच्या थंडगार वाऱ्याने गावाला जाग आली. मेळाव्याच्या मैदानावर पुन्हा कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली होती. रात्रीच्या शांततेनंतर गावात पुन्हा एकदा घोषणांचा आणि गडबडीचा माहोल निर्माण झाला.
नेताजी सकाळी लवकर उठले. चेहऱ्यावर ताजेपणा होता. रात्रीची विश्रांती त्यांना चांगली लाभली असल्याचे त्यांच्या हालचालींवरून स्पष्ट जाणवत होते.
सकाळी आठच्या सुमारास त्यांचा चालक गाडी घेऊन मोहनलालच्या घरासमोर येऊन उभा राहिला. शिपायाने सामान आवरायला सुरुवात केली.
मोहनलाल आदराने म्हणाला,
"नेताजी, इथेच आंघोळ करून, नाश्ता करून मग जा. घरात कसलीच कमी पडू देणार नाही."
नेताजी हलकेसे हसले.
"नको, माझं सर्व सामान डाक बंगल्यावरच आहे. तिथे जाऊन अगोदर तयार होतो. तसंही मेळाव्याचं मैदान तिथून जवळ आहे. आपण आता तिथेच भेटू."
क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले,
"मी अजून दोन दिवस इथेच आहे. काल तुमच्या घरचा पाहुणचार मला मनापासून आवडला. जेवण तर अतिशय रुचकर होतं. आणि इतक्या दिवसांच्या धावपळीनंतर काल रात्री बर्याच दिवसांनी निवांत झोप लागली."
हे ऐकून मोहनलालच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं.
"नेताजी," तो नम्रपणे म्हणाला, "हे घर आता आपलंच समजा. आपण कधीही आलात, तरी आमचं घर तुमच्यासाठी कायम उघडं आहे."
नेताजींनी त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला.
"तुझा हा विश्वास मी विसरणार नाही."
मोहनलालच्या चेहऱ्यावर अभिमान आणि समाधान एकाच वेळी झळकत होते. त्याला वाटत होते की, आयुष्याने अखेर त्याच्याकडे हसून पाहायला सुरुवात केली आहे. पण नियतीने लिहिलेली पुढची पानं अजून त्याच्या नजरेस पडायची बाकी होती.
त्या रात्री घरात काहीतरी बदलल्याची जाणीव उमाला सतत होत होती. सकाळपासून जे साधं, शांत घर होतं, ते अचानक मोठ्या लोकांच्या येण्या-जाण्याने, पैशांच्या चर्चेने आणि भविष्यातील स्वप्नांनी भरून गेलं होतं. वडिलांच्या डोळ्यांत तिने यापूर्वी कधी न पाहिलेली चमक होती. आईच्या चेहऱ्यावर समाधान होतं, पण त्यामागे कुठेतरी एक दडपणही लपलेलं दिसत होतं.
उमा शांतपणे सगळं पाहत होती.
तिच्या लक्षात येत होतं की आता घरात बोललं जाणारं प्रत्येक वाक्य तिच्याभोवती फिरत आहे. या पूर्वी तिच्या आयुष्याचे निर्णय तिच्यासमोर घेतले जात होते पण तिचं मत कुणी फारसं विचारत नव्हतं. आता सर्वच बदललं होत. वडिलांच्या आनंदाकडे पाहून ती काही बोलू शकली नाही. आयुष्यभर कष्ट करणाऱ्या त्या माणसाच्या चेहऱ्यावर आज पहिल्यांदाच समाधान दिसत होतं. तो आनंद हिरावून घेण्याचा अधिकार आपल्याला आहे का ?, हा प्रश्न तिच्या मनात पुन्हा पुन्हा उमटत होता.
खरेतर तर त्या रात्री तिला झोपच लागली नाही.
बाहेर हिवाळ्याचा वारा सुसाट वाहत होता. अधूनमधून कुत्र्यांचे भुंकणे आणि दूरवरून येणाऱ्या वाहनांचा क्षीण आवाज कानावर पडत होता. ती कूस बदलत राहिली. डोळे मिटले की नेताजींचे शब्द आठवत होते.वडिलांचा आनंद आठवत होता आणि स्वतःचं अनिश्चित भविष्यही.
पहाटे कधी तरी तिचा डोळा लागला.
सकाळी जाग आली तेव्हा घरात पुन्हा लगबग सुरू झाली होती. ती हळूच आरशासमोर जाऊन उभी राहिली.
क्षणभर ती स्वतःचे विस्कटलेले केस आणि खांद्यावरून निसटलेला पदर सावरत आरशासमोर उभी राहिली. थरथरत्या नजरेने तिने स्वतःकडे पाहिले. आरशात तोच चेहरा होता, काही तासांपूर्वी निरागस असलेल्या उमाऐवजी, आता तिला स्वतःमध्ये काहीतरी बदलल्याची जाणीव होत होती. ती तशीच बराच वेळ निःशब्द स्वतःलाच निरखत राहिली.
"हेच ते रूप.. ज्याचं सगळे कौतुक करतात?" तिने मनात विचारलं.
कालपर्यंत हेच सौंदर्य तिच्यासाठी ओझं वाटत होतं. आज त्याच सौंदर्यामुळे तिच्या आयुष्याला वेगळं वळण मिळणार होतं. पण ते वळण खरंच सुखाचं आहे की एखाद्या अज्ञात वाटेची सुरुवात आहे, याचं उत्तर तिच्याकडे नव्हतं.
तिने हलकेच आरशाला स्पर्श केला.
आरशात दिसणारा चेहरा तोच होता पण एका रात्रीत तिच्या डोळ्यांतील निरागसपणा मात्र कुठेतरी हरवल्यासारखा वाटत होता..
क्रमश:..🖋️📚📖
जर हा भाग तुम्हाला भावला असेल, तर तुमचा अभिप्राय नक्की द्या, कथा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि 'सौंदर्य : शाप की वरदान' या मालिकेचा पुढील भाग वाचायला अजिबात विसरू नका.
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
👨🏻💼 Connect With Us
📧 Gmail: sjomkar21@gmail.com
🔗 वरील कोणत्याही सोशल मिडिया नावावर क्लिक करून आमच्या अधिकृत सोशल मीडिया प्रोफाइलला भेट द्या.
ℹ️ सूचना: काही लिंक उघडताना गुगल कडून "Redirect Notice" दिसू शकते. अशा वेळी कृपया "Redirect" वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही आमच्या अधिकृत प्रोफाइलवर पोहोचाल.
© All Rights Reserved


शीर्षकच इतकं बोलकं आहे की वाचल्याशिवाय राहवत नाही.
उत्तर द्याहटवाछान अभिप्राय...
हटवाविश्वासघाताची सुरुवात इतकी शांत असते, हे अगदी खरं आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद...पुढील भाग सुद्धा वाचावेत..
उत्तर द्याहटवा